फोटो सौजन्य: गुगलवरून साभार |
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि हे स्वातंत्र्य इतक्या सहजासहजी मिळालेले नाही. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कित्येक हुतात्म्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू अशी कित्येकांची नावे घेता येतील. हा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहेच, आपण आता स्वतंत्र भारतात वावरत आहोत. या स्वतंत्र भारतात पक्षांना समाजकारणापेक्षा अजूनही राजकारणात जास्त रस आहे. या राजकारणात स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांना खेचलं जातंय, ही एक शोकांतिकाच आहे. गेल्यावर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकांतही आपण हे पाहिलेच आहे. एक सामान्य नागरिकाला इतिहासाची ओळख असते आणि प्रत्येक छोट्या छोट्या ऐतिहासिक मुद्यावर राजकारण करणे, हे त्याला जमत नाही. मीही असाच एक सर्वसामान्य भारतीय नागरिक असून महापुरुषांकडून जे काही चांगले शिकता येईल, ते शिकण्याचा प्रयत्न हा सुरु असतोच. काल म्हणजेच, २८ मे ला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती. त्यांना विनम्र अभिवादन.
तुम्हाला आठवत असेल की गेल्यावर्षी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने “सावरकर: नायक की खलनायक” असा कार्यक्रम घेतलेला आणि त्या कार्यक्रमात गांधीवादी, हिंदुत्ववादी आणि सावरकरप्रेमी यांनी सहभाग नोंदविलेला होता. याच कार्यक्रमानंतर त्यांची टीआरपी घसरली आणि नंतर त्यांनी त्यासाठी माफी मागितली, हे आपणासर्वांस ज्ञात आहे. असे बरेच काही आपल्या आसपास घडत असते. कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे देखील यावर बोलले आहेत. दुसरीकडे भाजप आणि इतर उजव्या संघटनांनी सावरकर कसे हे देशभक्त आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न हा केलाच आहे. त्यामुळे आपल्या समोर नेहमीच एकंदरीत “ गांधी की सावरकर” असा विषय ठेवला जातो आणि मान्यवर विविध संदर्भ घेऊन याविषयी वादविवाद करत असतात. “गांधी की सावरकर” यापेक्षा ”गांधी आणि सावरकर” असे का असू शकत नाही ? हा प्रतिप्रश्न मला पडतो. गांधी की सावरकर, हे असे विषय घेऊन सामान्य नागरिकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न हा सुरु असतो. म्हणजेच या दोन्ही महापुरुषांपैकी एकाची निवड करा असाच होतो. गांधी निवडला तर सावरकरांचा तिरस्कार करा आणि सावरकर निवडले तर गांधींचा तिरस्कार करा, अशीच एकंदरीत परिस्थिती सध्या दिसत आहे. आता फेसबुक आणि आणि व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून मला हे उघड उघड दिसत आहे. भविष्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्या चरित्राचा अभ्यास करून संदर्भासहित काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करेन.
एक पक्ष आणि एका विचारसरणीला वाहून घेतल्यानंतर दुसऱ्या महापुरुषाविषयी तिरस्कार करणे हे किती योग्य आहे? मुळात आपली संस्कृती दुसऱ्यांच्या विचारांचा द्वेष करायला शिकवत नाही उलट त्याचा आदरच करायला शिकवते, ह्या विचाराचा विसर भारतीय राजकारण्यांना आणि त्यांच्या अनुयायांना नक्कीच पडलेला आहे. हे असेच विविध पक्ष आणि विचार एकमेकांसोबत भांडत असतील आणि हे असेच चालू राहिले तर विकासाचा मुद्दा तुम्ही विसरूनच जा. इतिहासात बऱ्याच गोष्टी ह्या घडून गेल्या आहेत, इतिहास हा जश्याचा तसा स्वीकार करावा लागतो. आपण एक मात्र नक्कीच करू शकतो ते म्हणजे इतिहासातील झालेल्या चुका टाळणे. त्यांचे तेंव्हाचे विचार आताच्या काळात लागू पडतीलच असे नाही. भारतीय राजकारणात दुसऱ्याला चुकीचे म्हणून स्वतः कसे बरोबर आहोत, याची चढाओढ ही सुरु असतेच.
ह्या ब्लॉगचा उद्देश “ गांधी की सावरकर” हे ठरविणे नसून याच्यापुढे जाऊन काय करता येईल याविषयी आहे. हे एकमेकांविषयीचा तिरस्कार कुठे तरी संपायला हवा, त्यामुळे बदल कुठे करता येईल याचा विचार करण्यास नक्कीच वाव आहे. सामान्य नागरिकाच्या मते तर महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यामध्ये योगदान दिले आहे. दोन व्यक्तींना एकमेकांसमोर उभे करून विकास हा साधता येत नाही. महात्मा गांधी यांच्या विचारांनी संपूर्ण जग प्रभावित आहे आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न ती राष्ट्रे करत आहेत. भारताच्या उज्वल भविष्याबद्दल विचार करता, महात्मा गांधी यांचे विचार मार्गदर्शक आहेत तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विज्ञाननिष्ठ विचार देखील हे मार्गदर्शक आहेतच. भारताचे माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपायी यांनी लोकसभेतील एका भाषणात बोलले आहेत की, “ मतभेद ह्या असूद्यात पण मनभेद नको. सरकार येतील आणि जातील पण हा देश टिकला पाहिजे” आणि याच विचाराचे समर्थन पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी करतात. “गांधी आणि सावरकर” यातील 'आणि' या शब्दाला खूप मोठे अर्थ आहे, तो अर्थ आपल्याला लक्षात येईल इतकी आशा करतो. ह्या शब्दाचा अर्थ भारतीय राजकारण्यांना तसेच त्यांच्या अनुयायांना कळणे जास्त महत्वाचे आहे. भारताच्या सामान्य नागरिकांना देखील ठरवायचे आहे की, अशा कुत्सित विचारांत गुरफटून राहायचे आहे की हे सगळे झुगारून उज्वल भविष्यासाठी वाटचाल करावयाची आहे. मला याची पूर्ण कल्पना आहे की हा ब्लॉग खूप वर वरचा आहे पण ह्या राजकारणात एक छोटासा बदल खूप मोठा फरक आणू शकतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे येणाऱ्या काळात महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कोण कोणते विचार भारताच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, तेही मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.